निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींनी उद्या अर्थात २० मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवलं जाणार आहे. कोर्टाने सगळ्या आरोपींच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे चारही आरोपींना फासावर लटकवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी आरोपींची नावं आहेत. पवन गुप्ता आणि अक्षय सिंग या दोघांनी केलेल्या याचिका फेटाळून लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे निर्भयाच्या दोषींना उद्या फासावर लटकवलं जाणार हे निश्चित झालं आहे. हा निर्णय कोर्टाने दिल्यानंतर अखेरीस माझ्या मुलीला उद्या न्याय मिळणार आहे अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली आहे.

निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता.  २०१२ मध्ये घडलेल्या प्रकरणानंतर जनजागृतीची एक लाट देशभरात उसळली होती. तसंच अनेक अशी प्रकरणं बाहेर आली होती जी तोपर्यंत बाहेर येऊ शकली नाहीत. मुंबईतल्याही काही प्रकरणांना याच प्रकरणामुळे वाचा फुटली. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी सगळ्या देशात एक आंदोलन उभं राहिलं होतं. ज्याची व्याप्ती दिल्लीत सर्वात मोठ्या प्रमाणावर होती.

” गेल्या सात वर्षांपासून मी निर्भयाच्या दोषींना फाशी व्हावी यासाठी लढा दिला. उद्या चारही दोषींना फाशी होते आहे. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल” अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली आहे.

काय आहे प्रकरण?

दिल्लीत २०१२ मध्ये मेडिकलला शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिचा लैंगिक छळ करण्यात आला. तिला मारहाण करुन विवस्त्र अवस्थेत फेकूनही देण्यात आले. १६ डिसेंबर २०१२ ला घडलेल्या या घटनेमुळे सगळा देश हादरला होता. या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी सिंगापूरलाही नेण्यात आलं. मात्र २९ डिसेंबर २०१२ ला निर्भयाचा मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली. २०१३ च्या मार्च महिन्यात सहापैकी पाच आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. हायकोर्टाने २०१४ मध्ये या आरोपींची फाशी कायम ठेवली. तर मे २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टानेही ही फाशी कायम ठेवली. ट्रायल सुरु असतानाच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केली. एक आरोपी अल्पवयीन होता त्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.