भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला चांद्रयान-२ च्या लँडर बरोबर संपर्क प्रस्थापित करता आला नाही. चंद्रावर रात्र सुरु झाल्यामुळे आता हा संपर्क कधीच होऊ शकत नाही. लँडर आणि त्यामध्ये असलेल्या रोव्हरचे आयुष्य १४ दिवसांचे होते. ७ सप्टेंबरला इस्रोने चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा केलेला प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. दरम्यान इस्रोचे अध्यक्ष सिवन यांनी भारताच्या भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली आहे.

डिसेंबर २०२० मध्ये मानवी अवकाश विमान स्पेसमध्ये पाठवण्याची योजना आहे. ही मानवरहित मोहिम असेल.  जुलै २०२१ मध्ये मानवी अवकाश विमानाची दुसरी चाचणी असेल असे सिवन यांनी आयआयटी भुवनेश्वरच्या पदवीदान समारंभात सांगितले. डिसेंबर २०२१ मध्ये आपल्या स्वत:च्या रॉकेटमधून पहिला भारतीय अवकाशात पाठवण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी इस्रोमध्ये काम सुरु आहे असे सिवन म्हणाले.

चांद्रयान २ मधील ऑर्बिटर चांगले काम करत आहे. ऑर्बिटरमध्ये एकूण आठ उपकरणे असून त्यांच्याकडून अपेक्षित असलेले सर्व कार्य व्यवस्थित सुरु आहे. पण आम्ही लँडर बरोबर अजूनही संपर्क प्रस्थापित करु शकलो नाही असे सिवन यांनी सांगितले.

“लँडर बरोबर काय घडलं ते शोधून काढण्याला आमचे पहिले प्राधान्य आहे”. आमचे पुढचे प्राधान्य मिशन गगनयान असल्याचे सिवन यांनी सांगितले.चांद्रयान २ मोहिमेत ९८ टक्के यश मिळाले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षमतेचे सादरीकरण ही दोन उद्दिष्टये असल्यामुळे आम्ही या मोहिमेत ९८ टक्के यश मिळाले हे सांगत आहोत. तंत्रज्ञान क्षमतेच्या सादरीकरणात आम्ही मोठया प्रमाणात यशस्वी ठरलो आहोत असे सिवन म्हणाले.

गगनयान मिशन देशासाठी खूप महत्वाचे असून त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाला चालना मिळेल. नवीन शोध लावण्याबरोबर धोके पत्करण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. तुम्ही धोके पत्करले नाहीत तर आयुष्यात महत्वपूर्ण ठरणारे यश मिळवता येणार नाही असे सिवन म्हणाले.