प्रामाणिकपणे विकासाची कामे करणाऱ्या राजकीय पक्षालाच आता जनता पाठिंबा देते, त्या पक्षाला मते देऊन वारंवार सत्तेची संधी देते, हे बिहारच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच भाजप एकमेव देशव्यापी बनला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. बुधवारी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात ‘बिहार धन्यवाद’ कार्यक्रमात मोदी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

२१ व्या शतकातील भारताच्या नागरिकांनी वारंवार स्पष्ट संदेश दिला आहे की, प्रामाणिकपणे विकास करणाऱ्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळेल. सर्व राजकीय पक्षांकडून हीच अपेक्षा आहे. देशासाठी काम करा. बिहारमधील निकाल हेच दाखवत आहेत. २४ तास देशाचा विचार करा, नवे करण्याचा प्रयत्न करा. लोक तुमच्या मेहनतीला प्रतिसाद देतील. देशाचा विकास हाच भाजपचा मुख्य आधार आहे. बँक खाते, गॅस कनेक्शन, रोजगार, सुविधा, रस्ते, रेल्वे, रेल्वे स्टेशन, विमानतळ, नदीवर आधुनिक पूल, इंटरनेट कनेक्टिव्हिटी हे विकासाचे मुद्दे निवडणुकीत महत्त्वाचे ठरत नाहीत असा पक्षांचा गैरसमज होता. पण आता हेच मुख्य मुद्दे आहेत. देशाचा, राज्यांचा विकास हाच आगामी निवडणुका जिंकण्याचा आधार असेल, असे मोदी म्हणाले.

देशातील लोकशाही परंपरेवर भाजपचा विश्वास असून बिहार निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळवून दिले म्हणून नव्हे, तर निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत लोकशाहीचा उत्सव साजरा केला म्हणून मी नागरिकांचे आभार मानत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेचे कौतुक केले. बिहारची निवडणूक शांततेने आणि यशस्वीरीत्या पार पाडली गेली. त्याबद्दल निवडणूक आयोग, स्थानिक प्रशासन, निमलष्करी दल या सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत. कधी काळी बिहारमध्ये निवडणूक म्हटली की, किती लोक मारले गेले, किती बुथ लुटले, किती ठिकाणी पुन्हा मतदान झाले याचीच चर्चा होत असे. आता मतदानाची टक्केवारी किती वाढली, महिलांचे मतदान किती वाढले याची चर्चा होते. करोनामुळे मतदान कमी होईल ही शंकादेखील लोकांनी दूर केली, अशा शब्दांत निवडणूक प्रक्रियेचे मोदींनी कौतुक केले.

घराणेशाहीवर टीका

जे.पी. नड्डा यांच्या कुशल आणि प्रभावी रणनीतीमुळेच बिहारमध्ये भाजपला मोठे यश मिळाल्याचे सांगत मोदींनी नड्डा यांचे कौतुक केले. घराणेशाही मानणारे पक्ष, घराण्याचे पक्ष यांचे जाळे पसरले असून असे पक्ष लोकशाहीसाठी घातक बनत आहेत. या पक्षांचा देशाला मोठा धोका आहे. राष्ट्रीय स्तरावरील पक्षही (काँग्रेस) कुटुंबाचा पक्ष बनून गेला असल्याची टीका मोदींनी केली.

भाजपच्या निवडणुकीतील यशाचे रहस्य सुप्रशासनात आहे. करोनाच्या संकटात भारताने जशी लढाई लढली तशी कोणीही लढली नाही. करोनाविरोधातील लढय़ासाठी योग्य निर्णय घेतले गेले, त्याचे व्यवस्थापन केले गेले.

गरिबांना अन्नधान्याची मदत केली गेली. एक एक जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले हीच करोनामधील भारताची यशाची कहाणी आहे. करोनाकाळात शेती कायदा, स्वामित्व योजना, शिक्षण धोरण, ब्रॉडबँड योजना आदी महत्त्वाची धोरणे राबवली गेली असे पंतप्रधानांनी नमूद केले.

सर्वदूर भाजपच!

बिहारमध्येच नव्हे तर पोटनिवडणुकीत भाजपने पूर्वेतील मणिपूर, पश्चिमेत गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दक्षिणेत कर्नाटक व तेलंगणामध्येही यश मिळाले आहे. लडाखपासून दीव-दमणपर्यंत भाजपचा जयजयकार होत आहे. भाजप एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. देशाच्या नागरिकांनी तो देशभर पसरवला आहे. कधी काळी भाजप दोन जागांपुरता सीमित होता.  दोन खोल्यांतून पक्षाचा कारभार चालत असे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपचा विस्तार झाल्याचे नमूद केले.