पूर्व लडाखमधील भारतीय हद्दीत चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचे कागदपत्रांच्या माध्यमातून संरक्षण मंत्रालयाने मान्य केले होते. वेबसाइटवरील न्यूज सेक्शनमध्ये मंगळवारपासून ही माहिती दिसत होती. पण आता संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवरुन हे पेज गायब आहे.

नियंत्रण रेषेजवळ चीनची आक्रमकता वाढत चाललीय. खासकरुन पाच मे २०२० पासून गलवान खोऱ्याजवळ चिनी सैनिकांची आक्रमकता वाढत चाललीय. कुंगरांग नाला, गोग्रा आणि पँगाँग टीएसओच्या उत्तरेला १७-१८ मे ला चिनी सैन्याने अतिक्रमण केलेयं असे संरक्षण मंत्रालयाच्या कागदपत्रात म्हटले होते. हा मजकूर वेबसाइटवरील न्यूज सेक्शनमध्ये उपलब्ध होता. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशाच्या सैनिक अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेचा उल्लेखही होता. पण आता ही माहिती हटवण्यात आली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

सहा जूनला दोन्ही देशाच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये कॉर्प्स कमांडर्स स्तराची चर्चा झाली. त्यानंतर १५ जूनला गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. रविवारी भारतीय आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरची चर्चा झाली. पण अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. चीन पँगाँग टीएसओमधून मागे हटायला तयार नाहीय. त्यामुळे तणावाची स्थिती कायम आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ एप्रिलपासून भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने उभे ठाकले होते. काही भागातून चिनी सैन्य माघारी फिरले आहे. पण अजूनही सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.