रेल्वे रुळावर बसून दारु पिणाऱ्या इंजिनिअरींगच्या चार विद्यार्थ्यांचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला. तामिळनाडूत कोइमबतोरमध्ये रावुथूर पीरीवु येथे बुधवारी रात्री ही दुर्देवी घटना घडली. या अपघातात एका विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. रात्री १०.३० च्या सुमारास अलेप्पी-चैन्नई एक्सप्रेस रावुथूर पीरीवु येथून जात असताना हा अपघात घडला. लोको पायलटने त्याच्या वरिष्ठांना या अपघाताची माहिती दिल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांना कळवले. चार मुलांचे मृतदेह रेल्वे रुळावर पडलेले होते. चारही मृतदेहांची ओळख पटली आहे. मृत विद्यार्थ्यांपैकी सिद्दीक बीईच्या शेवटच्या वर्षाला होता. राजासेकर तिसऱ्या वर्षाला शिकत होता. दोघेही सुलूर येथील खासगी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. थेनी येथे राहणारा विग्नेश नावाचा मुलगा अपघातातून थोडक्यात बचावला. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. कोइमबतोर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.