सुखी वैवाहिक जीवन ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे असे आता संशोधनात अधिकृतपणे सिद्ध झाले आहे, त्यामुळे ‘नांदा सौख्य भरे’ या उक्तीला जरा जास्तच महत्त्व आले असून सुखी संसारच माणसाला त्याचे जीवन सर्वार्थाने समृद्ध करण्यास मदत करतो असे म्हणायला हरकत नाही. काही जोडप्यांच्या विवाहाची गुणवत्ता व आरोग्य यांचा संबंध ब्रिगहॅम यंग विद्यापीठातील कुटुंब संशोधक रिक मिलर यांनी तपासला असता त्यांना असे दिसून आले की, जसा विवाहाचा दर्जा वर्षांगणिक वाढत जातो तसे शारीरिक प्रकृतीही सुधारत जाते. विवाहानंतर जर त्या नवरा-बायकोचे वारंवार खटके उडत असतील तर त्या विवाहाची गुणवत्ता फारशी नसते व अशा स्थितीत दोघांचीही शरीर प्रकृती फार चांगली राहात नाही असे यापूर्वीच्या संशोधनातही दिसून आले आहे. आताच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, तुमचा विवाहाचा दर्जा जर चांगला असेल म्हणजे स्वभाव, एकमेकांना समजून घेणे हे सगळे पूरक असेल तर नवरा-बायको दोघांचीही प्रकृती चांगली राहते व वर्षांगणिक ती सुधारत जाते, आताचे हे संशोधन जर्नल ऑफ मॅरेज अँड फॅमिली या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. सकारात्मक वैवाहिक संबंध हे दीर्घकाळ तुमची प्रकृती निरोगी ठेवतात असे १६८१ जोडप्यांच्या अभ्यासात दिसून आले आहे. गेली २० वर्षे हे संशोधन सुरू होते. वैवाहिक दर्जा व आजपर्यंतचे आरोग्य यांचा संबंध स्पष्ट करणारे हे सर्वात मोठे संशोधन आहे. मिलर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यात विवाहाचा दर्जा ठरवण्यासाठी दोन घटकांचा वापर केला त्यात सुखाच्या संकल्पना व समाधान हा पहिला घटक होता, तर वैवाहिक समस्या (म्हणजे तुम्ही सासू-सासरे यांच्यावरून भांडता काय?, तुम्ही पैशांवरून वादावादी करता का?) हा दुसरा घटक होता. प्रतिसादकांनी त्यांची प्रकृती १ (उत्तम) ते ४ (अतिशय वाईट) या मोजपट्टीवर सांगितली. त्यानंतर आकडेवारीचा व माहितीचा अभ्यास केला असता असा निष्कर्ष निघाला की, ज्यांच्यात वैवाहिक संघर्ष होते त्यांची शारीरिक प्रकृती खूप वाईट होती.मिलर यांनी सांगितले की, वैवाहिक संघर्षांचा परिणाम हा दोघांच्याही प्रकृतीवर होत असतो. जी जोडपी कडाडून भांडतात, तावातावाने सतत युक्तिवाद करतात त्यांच्या शरीर प्रकृतीवर परिणाम होतो त्यामुळे त्यांना समुपदेशनाची गरज आहे एवढाच या सगळ्याचा अर्थ आहे. जर तुमचा विवाह चांगल्या दर्जाचा असेल तर जरी जोडीदाराचा एखादा दिवस वाईट गेला तरी त्याला समजून घेतले जाते. एकमेकांशी अशी सहानुभूती दाखवल्याने दोघांच्याही मनावरचा ताण कमी होतो परिणामी शरीर प्रकृती चांगली राहते, असे मिलर यांनी सांगितले.