गुजरातमध्ये शेतकऱ्यांसाठी काँग्रेसकडून आंदोलन सुरु असून यातील एका आंदोलनात काँग्रेस आमदार गेनीबेन ठाकोर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. 'मला शक्य असते तर मी भाजपावाल्यांची हत्या केली असती', असे विधान आमदार ठाकोर यांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वी बनासकांठा येथे गेनीबेन ठाकोर यांनी एका आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना संबोधित केले. त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासासाठी सत्ताधारी भाजपा जबाबदार आहे. शेतकऱ्यांसाठी मी हातात शस्त्र घ्यायला तयार आहे. मला शक्य असते तर मी भाजपावाल्यांची हत्या केली असती आणि यासाठी स्वखुशीने तुरुंगातही गेले असते, असे त्यांनी म्हटले आहे. 'मला माहितीये की आमदार म्हणून मी अशी भाषा वापरणे चुकीचे आहे. पण शेतकऱ्यांसाठी मी काहीही करायला तयार आहे', असे त्यांनी नमूद केले. ठाकोर यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला असून भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. भाजपाचे प्रवक्ते भरत पंड्या म्हणाले, एकीकडे काँग्रेस नेते महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणार असे सांगतात. पण दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे आमदार हिंसेची भाषा वापरतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आमदार ठाकोर या स्वतःदेखील शेतकरी असून शेतकरी नेत्या म्हणूनच त्या राजकारणात आल्या. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गुजराती माजी मंत्री शंकर चौधरी यांचा पराभव केला होता.