उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून मोठा संघर्ष बघायला मिळत आहे. एकीकडे संताप व्यक्त करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरताना दिसत आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमधील शाब्दिक वादही शिगेला पोहोचला आहे. विरोधकांकडून उत्तर प्रदेशातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल प्रश्न विचारले जात आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या टीका होत असतानाच भाजपाच्या माजी आमदारानं या प्रकरणात धक्कादायक दावा केला आहे. हाथरसमध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची तिच्या आई व भावानं हत्या केल्याचा दावा भाजपा माजी आमदारानं केला आहे.

‘न्यूज १८’ वृत्तवाहिनीनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. माजी आमदार राजवीर सिंह पहेलवान यांनी असा आरोप केला आहे की, पीडित मुलीची हत्या तिच्या आई व भावानेच केली आहे. “मुलीची तिच्या आईने व भावानेच हत्या केली आहे. या प्रकरणात जातीवादावरून राजकारण केलं जात आहे. चारही युवक निर्दोष आहे. त्यांना फसवण्यात आलं आहे,” असा दावा ठाकूर यांनी केला आहे.

“हे प्रकरण मारहाणीचं आहे. जर चार मुलांवर गुन्हा दाखल झाला असता, तर त्यांची कोणतीही तक्रार नव्हती. पण, या सामूहिक बलात्काराच्या आरोपांबरोबरच युवकांना अटक केल्यानं लोकांमध्ये रागाची भावना आहे. या मतदारसंघातील लोकांशी चर्चा झाली आहे. ज्यांना जनाधार नाही, तेच लोक आंदोलन करत आहेत. सरकारला विनाकारण बदनाम केलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणाला असं वळणं दिलं गेलं की, हाथरस देशभरात बदनाम व्हावं. आम्हाला एसआयटीच्या तपासावर पूर्ण विश्वास आहे. सत्य समोर येईलच,” असा विश्वास माजी आमदार पहेलवान यांनी व्यक्त केला आहे.