मध्यप्रदेश काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी हनी ट्रॅप रॅकेटवरून भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक लग्न करत नाही, हे हनी ट्रॅपचे प्रमुख कारण आहे. त्यांनी लग्न करायला हवे, एवढेच नाहीतर त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील लग्न करायला हवे, असेही म्हटले आहे.

यावेळी अग्रवाल यांनी हे देखील सांगितले की, तपासासाठी नेमलेली ‘एसआयटी’ आपले काम करत आहे. हे सर्व शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारच्या कार्यकाळात सुरू झाले होते. तसेच, मोठ्या प्रमाणात भाजपा नेत्यांचा यात सहभाग आहे. याचा विस्तार पाच ते सहा राज्यांमध्ये झालेला असेही ते म्हणाले.

मध्य प्रदेशातील हनी ट्रॅप रॅकेटमध्ये अजून एक मोठा खुलासा झाला आहे. या टोळीतील सदस्यांककडून आयएएस अधिकाऱ्यांची ‘टार्गेट लिस्ट’ तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे. या अधिकाऱ्यांना तरुणींनी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलं होतं आणि सेक्स व्हिडीओ तयार करत ब्लॅकमेल करण्याची तयारी केली होती. हनी ट्रॅप गँगच्या यादीत या अधिकाऱ्यांची नावं कोड वर्डच्या माध्यमातून नोंद करण्यात आली आहेत.

देशातील सर्वात मोठा ब्लॅकमेलिंग सेक्स स्कॅण्डल म्हटल्या जाणाऱ्या या प्रकरणात आतापर्यंत तपास यंत्रणांनी चार हजाराहून अधिक फाईल्स तयार केल्या असून अद्यापही तपास सुरु आहे. या गँगने आतापर्यंत चार राज्यातील महत्त्वाचे नेते, आयएएस अधिकारी, इंजिनिअर आणि मोठे व्यापारी यांना आपलं शिकार बनवलं आहे. सेक्स व्हिडीओ, अश्लिल चॅट तसंच ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याचे इतर पुरावे टोळीतील सदस्यांच्या लॅपटॉप आणि मोबाइलमधून हस्तगत करण्यात आले आहेत.