पीएनबी घोटाळ्यात जी सर्व मोठी नावे समाविष्ट आहेत, ते सर्व लोक गुजरातचे आहेत. यांना निश्चितच कोणीतरी घोटाळ्यासाठी मदत केली असेल, असा भाजपाला टार्गेट करणारा सूचक दावा माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे. बंगळूरूत एका कार्यक्रमात ते बोलत होते.


चिदंबरम म्हणाले, आपल्याला सरकारला आणखी कठीण प्रश्न विचारायला हवेत, जो पर्यंत जनता सध्याच्या सरकारला जास्तीत जास्त प्रश्न विचारत नाही तोपर्यंत हे सरकार जनतेकडे असेच दुर्लक्ष करीत राहील. सध्या देशात रोजगार उपलब्ध नाहीत, याची सरकारला माहिती आहे. त्यामुळेच ते भजी विकण्यालाच रोजगार म्हणून संबोधत आहे. हे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. गुजरातमधील लोकांनी यांना कठीण प्रश्न विचारले होते. त्याचा परिणाम तिथे दिसून आला. लोकांना आता अशीच प्रश्न विचारण्यासाठी पुढील संधी असून ती कर्नाटकात आहे.


पीएनबी घोटाळ्यावर बोलताना चिदंबरम म्हणाले, हा संपूर्ण घोटाळा एकाच क्षेत्रात झाला आहे. तो ही ज्वेलरीच्या क्षेत्रात. यामध्ये समोर आलेले सर्व मोठे आरोपी हे गुजरातमधीलच आहेत. म्हणजेच हे सर्व एकाच क्षेत्रात आणि एकाच राज्यातील लोकांनी घडवले आहे. त्यामुळे ही बाब उघड आहे की, या लोकांना कोणीतरी येथून मदत केली असणार. मात्र, यांना कोणी आणि कशी मदत केली याचे माझ्याकडे पुरावे नाहीत.