आजचा २६ नोव्हेंबरचा ऐतिहासिक दिवस आहे. ७० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपण विधीवत संविधान स्वीकारले होते. संविधान आमच्यासाठी सर्वात मोठा ग्रंथ आहे. भारताचे संविधान आपल्याला नागरीकांना असलेले अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करुन देते. हा आपल्या संविधानाचा विशेष पैलू आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. संविधान दिनाच्या निमित्ताने ते संसदेमध्ये बोलत होते.

“संविधानामध्ये जी कर्तव्य नमूद केली आहेत ती कशी पूर्ण करता येतील त्याबद्दल आपण विचार करुया” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “भारताचे नागरीक असल्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. आपण आपल्या कृतीने देशाला अधिक मजबूत, सशक्त बनवूया. संविधानाने आपल्या सर्वांना एकत्र बांधले आहे” असे मोदी म्हणाले.

“गेल्या ७० वर्षात आपण स्वातंत्र्य आणि लोकशाहीला अधिक सशक्त बनवले आहे. सात दशकांपूर्वी संसदेच्या याच सेंट्रल हॉलमध्ये संविधानाच्या प्रत्येक अनुच्छेदावर सविस्तर चर्चा झाली. भारताच्या प्रत्येक स्वप्नाला शब्दामध्ये गुंफण्याचा प्रयत्न झाला” असे मोदी म्हणाले. “भारताच्या नागरीकांपासून संविधानाची सुरुवात होते. यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश असून कठीण पेचावरही तोडगा सांगितला आहे” असे मोदी म्हणाले.