बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उत्तराखंडच्या आपत्तीमधून बिहारींना सोडवण्यासाठी तिथे जाणारा मी काही रॅम्बो नाही, अशा शब्दात त्यांनी मोदींना टोला लगावला. गेल्या आठवडय़ात मोदी यांनी उत्तराखंडला जाऊन १५ हजार गुजराती नागरिकांची सुटका केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावर काँग्रेसने मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत इतक्या कमी वेळात नागरिकांची सुटका करणारे मोदी काय रॅम्बो आहेत काय, अशी उपहासात्मक टीका केली होती. मात्र मोदींनी इतक्या मोठय़ा प्रमाणात लोकांना सोडवण्याचा दावा केलाच नव्हता, असे स्पष्टीकरण भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी दिले होते. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनेही या वृत्तानंतर मोदींचा समाचार घेतला होता. आता नितीशकुमारांनीही मोदींना लक्ष केले आहे. मोदींची प्रचारप्रमुखपदी निवड झाल्यानंतर  संयुक्त जनता दलाने भाजप बरोबरची १७ वर्षांची युती तोडली होती.