मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे अभिनेते प्रकाश राज यांनी आपल्याला वारंवार धमकी दिल्यास राजकारणात प्रवेश करण्यास कचरणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

बेंगळुरू येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या उपस्थितीत प्रकाश राज म्हणाले, राजकारणात उतरण्यात मला रस नाही. पण जर मला वारंवार धमकी दिली, जर कोणी माझ्यावर सातत्याने दबाव टाकू लागला, जर कोणी मला वारंवार राजकारणात उतरण्याचे आव्हान देऊ लागले तर मी निश्चित राजकारणात प्रवेश करेल.

सिद्धरामय्यांच्या उपस्थितीत प्रकाश राज यांनी केलेल्या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. प्रकाश राज अशी वक्तव्ये करून राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत देत असल्याचे बोलले जात आहे. कर्नाटकमध्ये याचवर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकी आधी ते काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

मोदीसरकारवर टीका करण्याची प्रकाश राज यांची ही पहिलीच वेळ नाही. मोदी सरकारवर टीका केल्यामुळे ते सातत्याने चर्चेत असतात. पत्रकार गौरी लंकेश यांच्या खून प्रकरणी त्यांनी आपला राष्ट्रीय पुरस्कार परत देण्याची धमकी दिली होती.

राष्ट्रवाद आणि हिंदुत्व सारखेच असल्याचे म्हटल्याने प्रकाश राज यांनी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना लक्ष्य केले होते. सेक्युलर लोक निधर्मी असतात, हा अनेकांचा गैरसमज आहे. इतर धर्मांचा आदर करणे, हा सेक्युलरिझमचा खरा अर्थ असल्याचे प्रकाश राज यांनी म्हटले होते. तुम्ही लोकप्रतिनिधी असूनही एखाद्याच्या पालकांविषयी इतक्या खालच्या पातळीला जाऊन कसे बोलू शकता, असा सवाल प्रकाश राज यांनी विचारला होता.