Independence Day 2018: महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. मात्र, यासोबतच सैतानी वृत्तीही समोर येते. बलात्कारासारख्या सैतानी मनोवृत्तीपासून देशाला मुक्त करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७२ व्या स्वांतत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ला येथे ध्वजारोहण केले. यानंतर मोदींनी देशाला संबोधित केले. मोदी सरकारचा या टर्ममधील हा शेवटचा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा असून भाषणात मोदी काय बोलणार याची उत्सुकता होती. मोदींनी भाषणात सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या कामकाजाचा पाढा वाचून दाखवला. तसेच काँग्रेसप्रणित यूपीए सरकार आणि मोदी सरकारच्या कामाच्या पद्धतीतील फरकही सांगितला. देश तोच आहे, जमीन, आकाश, समुद्र, सरकारी कार्यालय देखील तेच आहे. निर्णय घेणारी प्रशासकीय यंत्रणाही तीच आहे. मात्र, तरीही गेल्या चार वर्षात देशाने बदल अनुभवला. कृषीपासून ते आर्थिक पातळीवर सरकारने विविध योजना राबवल्या, असे त्यांनी सांगितले. देशातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवरुन विरोधकांनी भाजपावर टीका केली आहे. अखेर मोदींनी या घटनांवर मौन सोडले. मोदी म्हणाले, देशात महिलाशक्तीचे दर्शन घडत आहे. पण दुसरीकडे महिलांवरील बलात्काराच्या घटनाही घडतात. या सैतानी वृत्तीपासून देशाला मुक्त करण्याची गरज आहे. बलात्कार हा पीडित मुलीसाठी जितका वेदनादायी असतो तितक्याच किंवा त्यापेक्षा जास्त वेदना समाजालाही झाल्या पाहिजे, असे त्यांनी सांगितले. भाषणानंतर मोदींनी कार्यक्रमासाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांची भेट घेतली.