एकीकडे तणाव निवळण्यासाठी भारतासोबत चर्चा करत असलेल्या चीननं सीमेवरील आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झडप झाल्याचं वृत्त आहे. २९-३० ऑगस्टच्या रात्री दोन्ही देशाचे सैनिक आमने-सामने आल्याची माहिती समोर आली असून, यावेळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैन्याला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये काही मुद्द्यांवर सहमती झाली होती. त्यांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्यानं दिली आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या सैनिकांनी आधी ठरलेल्या एकमताचं उल्लंघन केलं आणि पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पँगोंग लेक परिसरात दोन्ही देशाचे सैनिक 29-30 ऑगस्टच्या रात्री आमने-सामने आले होते. पण भारतीय लष्कराने प्रतिकार करत पँगोंग आणि Tso Lake परिसरात चीनच्या सैनिकांना घुसखोरीपासून रोखलं.

दरम्यान, पँगाँग तलाव परिसरात दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाल्यानंतर चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. भारतीय लष्कर शांतता राखण्यावर विश्वास ठेवतं, पण आपल्या सीमेचं रक्षण करण्यास सक्षम असल्याची प्रतिक्रिया भारतीय लष्कराने दिली आहे.

यापूर्वी जूनमध्ये (१५ जून) भारत आणि चीनच्या सैन्यात गलवान खोऱ्यात जोरदार झटापट झाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. या झटापटीनंतर दोन्ही देशांमधील तणाव कमी व्हावा यासाठी चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा दोन्ही देशांचे सैनिक भिडल्याचं वृत्त आलं आहे. यामुळे सीमेवरील तणाव अजूनही कमी झालेला नसल्याचं स्पष्ट होत असून चिनी सैन्य पूर्व लडाखमधून मागे हटायला तयार नसल्याचंही समोर येत आहे.