पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : सामाजिक, डिजिटल आणि आर्थिक यासह १० देशांच्या आसिआन गटांशी सर्व प्रकारची संपर्कता वृद्धिंगत करणे याला भारत प्राधान्य देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. भारत आणि आसिआन यांच्यातील आभासी शिखर परिषदेत पंतप्रधान बोलत होते.

शारीरिक, आर्थिक, सामाजिक, डिजिटल, सागरी यासह सर्व क्षेत्रांत भारत आणि आसिआन यांच्यात सर्व प्रकारची संपर्कता वृद्धिंगत करण्याला आमचे प्राधान्य आहे. गेल्या काही वर्षांत या सर्व क्षेत्रांमध्ये आम्ही जवळ आलो आहोत. सर्वाच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी आसिआन देश संलग्न आणि प्रतिसादक्षम असणे गरजेचे आहे, भारताच्या इंडो-पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह आणि आसिआनच्या आऊटलुक ऑन इंडो पॅसिफिक यांच्यात बरेचसे साधम्र्य आहे, असेही मोदी या वेळी म्हणाले.

दक्षिण चीन सागरी क्षेत्र आणि पूर्व लडाखमध्ये चीनने घेतलेली आक्रमक भूमिका या पार्श्वभूमीवर ही शिखर परिषद होत आहे. आसिआनमधील अनेक देशांचा दक्षिण चीन सागरी क्षेत्रात चीनशी प्रांताबाबत वाद आहे. व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्यावर भर देत असताना गेल्या काही वर्षांत भारत आणि आसिआन देशांमधील संबंध वृद्धिंगत होत आहेत.