बलात्कार, अत्याचार आणि पुरुषी समाजव्यवस्थेची सातत्याने बळी ठरणारी भारतीय स्त्री जगभरामध्ये असुरक्षित आणि अबला म्हणून ओळखली जात असली, तरी या प्रतिमेच्या शेकडोपट लांब उडी मारणारी प्रतिमा भारतीय स्त्रीशक्तीने कमावली आहे. भारतीय महिला व्यावसायिक या अमेरिकी, जर्मनी आणि जपानसारख्या अग्रेसर राष्ट्रांतील पुढारलेल्या स्त्रियांहून अग्रेसर असल्याचे नव्या अहवालातून समोर आले आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून सर्वच क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या जगभरातील महिलांचा अभ्यास  केला असता, भारतीय स्त्री अवघड परिस्थितीमध्येही आपल्या कामामध्ये सक्षम असल्याचे ‘सेण्टर फॉर टॅलेण्ट इनोव्हेशन’ या अभ्यासगटाने म्हटले आहे.
अभ्यास काय?
‘हार्वर्ड बिझनेस रिव्ह्य़ू’मध्ये या अहवालामधील भाग सादर करण्यात आला आहे.  ‘सेण्टर फॉर टॅलेण्ट इनोव्हेशन’च्या अध्यक्षा सिल्व्हिया अ‍ॅन हेवलेट यांनी भारत, जपान, जर्मनी आणि अमेरिकेमधील उच्चशिक्षण (पदवी) घेतलेल्या  ७७५ महिलांच्या अभ्यासातून स्त्री सक्षमतेची परीक्षा घेण्यात आली. याद्वारे अभ्यासासाठी निवडलेल्या महिलांपैकी ३६टक्के महिलांनी अल्प काळासाठी आपल्या अस्तित्वात असलेल्या नोकऱ्या सोडल्या. एक वर्षांहून कमी काळासाठी या महिलांना आपल्या कामाच्या क्षेत्रापासून लांब राहण्यास सांगण्यात आले.
 नोकरी सोडल्यानंतरही त्याच कामासाठी नव्या जागी रुजू होण्यासाठी ९१टक्के भारतीय महिला इच्छुक असल्या, तरी त्यातल्या सर्वाना नवी नोकरी पुन्हा प्राप्त करण्यात कसलीही अडचण आली नाही. अमेरिका, जपान, जर्मनीमधील महिलांना मात्र त्यात सुखावह यश मिळाले नाही.
हे कसे घडले?
नोकरी सोडल्यानंतरही भारतीय महिला पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करताना दिसल्याचे अहवालात म्हटले आहे. ७३टक्के महिलांनी पर्यायी अल्प काळाची सेवा, लवचीक वेळांमध्ये काम करण्याची तयारी दर्शवून पुन्हा नवी नोकरी मिळविण्यात यश मिळविले. अमेरिकेतील ५८टक्के, जर्मनीतील ४९टक्के, तर जपानमधील केवळ ३६टक्के महिला हे करण्यात यशस्वी झाल्याचे दिसून आले. ७२टक्के महिला पूर्वीच्या जागी पुन्हा जाण्यास इच्छुक नसल्याचे हेवलेट यांनी म्हटले आहे.
साधारण चित्र?
बहुतांश कमावत्या महिलांचे व्यवसाय किंवा नोकरीपासून दूर होण्यासाठी कारण हे मुलांचे संगोपन असते. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि काम यांच्यामध्ये कसरत करणाऱ्या महिलांना कंपनीकडून अथवा कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. पारंपरिक नोकरीचा मार्ग अवलंबण्यावर ६२टक्के महिलांचा भर असतो, मात्र तेथे येणाऱ्या सर्व अडचणींमध्ये समतोल साधत भारतीय कमावती ही जगामध्ये सर्वाधिक सहिष्णू आणि सक्षम असल्याचे अभ्यासामध्ये म्हटले आहे.