सध्या थंडीची तीव्रता कमी होत चालली आहे, हा आपला सामान्य अनुभव असला तरी त्याला आता हवामानशास्त्रीय दुजोराही मिळाला आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात तापमान नेहमीच्या सरासरी तापमानापेक्षा थंडीतही जास्त राहिले याचे कारण एल निनो परिणाम हेच होते, असे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. यावर्षी एल निनो परिणामामुळे पाऊस कमी तर झालाच; पण चेन्नईसारख्या ठिकाणी नको तेव्हा पाऊस पडला. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक लक्ष्मण राठोड यांनी सांगितले की, नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये तापमान तुलनेने जास्त होते. थंडीतही तापमान वाढण्याचा कल कायम असून तो यापुढेही कायम राहणार आहे. २०१५ हे सर्वात उष्ण वर्ष होते असे याआधीच जाहीर करण्यात आले आहे. जानेवारीत तापमान सरासरीपेक्षा जास्त होते व यात दिनमानातही वाढ होत आहे, त्यामुळे सौर प्रारणांचा परिणाम वाढत असून तापमान वाढतच चालले आहे. काही प्रादेशिक व काही जागतिक घटक यामुळे हिवाळा जास्त उबदार होत चालला आहे. पण ते फार चांगले लक्षण नाही. एल निनो हा परिणाम पॅसिफिकमधील तापमानाच्या वाढत्या तापमानाशी निगडित असून त्यामुळे यावर्षी हिवाळा आणखी त्रासदायक बनला असून पूर्वीची थंडी अनुभवता आलेली नाही, असे राठोड यांचे मत आहे. नैर्ऋत्य मान्सूनचा पाऊस कमी होण्यासही एल निनो परिणामच कारणीभूत होता. मध्य भारतात हिवाळ्यातही तापमान वाढण्यात प्रतिचक्रीवादळ हे कारण आहे. प्रतिचक्रीवादळ हे वादळाच्या विरोधी गुणधर्माचे असते व चक्रीवादळात वारे कमी दाबाच्या पट्टय़ात जातात. प्रतिचक्रीवादळात वारे उच्च दाबाच्या भागातून निघून उत्तर अर्धगोलार्धात घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने वाहतात, तर दक्षिण अर्धगोलार्धात घडय़ाळाच्या काटय़ाच्या विरूद्ध दिशेने वाहतात. एकूणच एल निनोचा परिणाम जागतिक तापमानवाढीवर होत असून कुठे जास्त पाऊस तर कुठे कमी पाऊस अशी परिस्थिती आहे, शिवाय हिवाळ्यातही तापमान सरासरीपेक्षा वाढत चालले आहे.