दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. जेएनयू (JNU) देशद्रोही घोषणाबाजी प्रकरणातील कन्हैया कुमारचा उल्लेख करताना, 'मला माहित नाही कन्हैयाने देशद्रोह केला आहे की नाही, त्याबाबत कायदेशीर चौकशी सुरू आहे. पण दिल्लीतील विकासकामांमध्ये आडकाठी आणणारे आणि दिल्ली ठप्प करण्याचा प्रयत्न करणारे पंतप्रधान मोदी देशद्रोही नाहीत का?' असा सवाल केजरीवालांनी केला आहे. 'मोदींनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या शाळा, रुग्णालय, सीसीटीव्ही कॅमेरे, मोहल्ला क्लिनीक अशा सगळ्या नागरिकांच्या हिताच्या प्रकल्पांमध्ये आडकाठी करुन दिल्ली ठप्प करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.हा देशद्रोह नाही काय?' असं ट्विट केजरीवाल यांनी केलं आहे. मुझे नहीं पता कन्हैया ने देशद्रोह किया है या नहीं, उसकी जाँच क़ानून विभाग कर रहा है। उधर मोदी जी ने दिल्ली के बच्चों के स्कूल रोके, अस्पताल रोके, CCTV कैमरे रोके, मोहल्ला क्लीनिक रोके, दिल्ली को ठप्प करने की पूरी कोशिश की - क्या ये देशद्रोह नहीं है? — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 24, 2019 दिल्लीच्या सत्तेत आल्यापासून सातत्याने केजरीवाल आणि त्यांचे मंत्री पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर दिल्लीतील विकासकामांना जाणूनबुजून परवानगी न देण्याचा, विकासकामांमध्ये आडकाठी आणण्याचा आरोप करत आहेत. यापूर्वी, काही दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांकडून तीन वर्षांनंतर कन्हैय्या कुमारसह 10 जणांविरोधात देशद्रोहाचे आरोपपत्र दाखल केलं आहे. पण आरोपपत्र दाखल करताना दिल्ली राज्य सरकारची परवानगीच घेतली नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत, न्यायालयाने सर्वांवर आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया तूर्तास पुढे ढकलली असून पोलिसांच्या कृत्यावर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दुसरीकडे दिल्ली राज्य सरकारच्या कायदा मंत्र्यांनी कायदा सचिवांना परवानगी न घेता प्रकरणाच्या फाइल गृहमंत्रालयाकडे पाठवल्याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.