दोन दिवसांपूर्वी कराची स्टॉक एक्सजेंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तान भारताला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण पाकिस्तानचा हा आरोप संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील अन्य देशांना मान्य नाहीय. त्यामुळेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून या हल्ल्यासंबंधी अजून कुठलेही वक्तव्य समोर आलेले नाही. यूएनएससीकडून पत्रक जारी करायला विलंब झाला आहे.

या दहशतवादी हल्ल्यात १९ जणांचा मृत्यू झाला. चार दहशतवाद्यांचा सुद्धा खात्मा झाला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून अशा दहशतवादी हल्ल्यानंतर निषेधाचे पत्रक लगेच जारी केले जाते. पण मंगळवारी शेवटच्या क्षणी सदस्यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, परराष्ट्र मंत्री मकदूम शाह महमूद कुरेशी यांनी कुठलेही पुरावे न देता या हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानकडून होणारे हे सर्व आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. भारतावर आरोप करुन कुरेशी यांनी वातावरण दूषित केले. त्यामुळे हा विषय सुरक्षा परिषदेने हाताळू नये असे मत UNSC च्या सदस्यांनी व्यक्त केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची भूमिका आज समोर येऊ शकते.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तान स्टॉक एक्सजेंच्या इमारतीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवादी स्टॉक एक्सचेंज इमारतीबाहेर गाडीतून उतरले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य प्रवेशद्वारावर ग्रेनेड फेकून इमारतीत घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला.