सरसंघचालक मोहन भागवतांच्या भारतीय सैन्याबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिलं आहे. भारतीय सैन्याला युद्धासाठी सज्ज होण्यास सहा महिने लागतील तर संघाचे स्वयंसेवक या गोष्टीसाठी फक्त तीन दिवस घेतील असे भागवतांनी म्हटल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. मात्र, संघाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार भारतीय सैन्याला सर्वसामान्य भारतीयांना युद्धसज्ज करायचे असतील तर सहा महिने लागतील मात्र, भारतीय सैन्य संघ स्वयंसेवकांना तीन दिवसांत युद्धसज्ज करू शकेल कारण स्वयंसेवक शिस्तबद्ध असतात असे भागवतांचे म्हणणे आहे.

मोहन भागवतांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे संघाने म्हटले आहे. रविवारी बिहारमधल्या मुझफ्फरनगरमध्ये भागवतांनी यासंदर्भात वक्तव्य केले होते. ‘जर तशीच परिस्थिती उद्भवली आणि भारतीय राज्यघटनेत हे बसत असेल तर सर्वसाधारण भारतीयाला युद्धसज्ज करण्यासाठी भारतीय सैन्याला सहा महिने लागती. मात्र भारतीय सैन्य संघाच्या स्वयंसेवकांना तीन दिवसांत युद्धसज्ज करेल कारण स्वयंसेवक अत्यंत शिस्तबद्ध असतात.’ असे स्पष्टीकरण संघाने दिले आहे.

त्यामुळे भागवतांनी स्वयंसेवकांची तुलना भारतीय सैन्याशी नाही तर भारतीय जनतेशी केल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार जर गरज पडलीच तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीन महिन्याक सैन्य उभारेल असे भागवतांनी म्हटले होते. ही आमची क्षमता असल्याचा दावाही त्यांनी केला होता. या नंतर भागवतांवर राहूल गांधींसह काँग्रेसने टीकेची झोड उठवली. भागवतांच्या वक्तव्याची लाज वाटते अशी प्रतिक्रिया देत राहूल गांधींनी टीका केली होती.

अर्थात आमची संघटना ही लष्करी अथवा निमलष्करी संघटना नसून कौटुंबिक संघटना असल्याचेही भागवत म्हणाले होते. बिहारमध्ये संघाच्या शिबिरामध्ये स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरून वादविवादाच्या फैरी झडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर संघाचे हे स्पष्टीकरण आले आहे.