देशाला प्रधानसेवक कसा हवा ते तुम्ही ठरवा. रात्र-दिवस मेहनत करणारा, कष्ट करणारा, भावी पिढीचा विचार करुन १८-१८ तास काम करणारा प्रधानसेवक तुम्हाला हवा की, देशाला गरज असताना कधीही सुट्टीवर जाणार प्रधानसेवक हवा. ते तुम्हीच निवडा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. माझ्याविषयी भरपूर अपशब्द बोलले जात आहेत पण चौकीदार थांबणार नाही, आता तर सुरुवात झाली आहे.

चोर देशात असो किंवा विदेशात चौकीदार एकालाही सोडणार नाही अशी गर्जना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. ते दिल्लीच्या रामलीला मैदानावर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बोलत होते. आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला चौकशीसाठी बोलावण्यात आले. नऊ तास बसवून माझी चौकशी केली.

पण काँग्रेसची फर्स्ट फॅमिली स्वत:ला कायद्यापेक्षा मोठी समजते. कोर्टाकडून समन्स बजावूनही सुनावणीला हजर राहत नाही. ज्यांचा देशाच्या संस्थांवर विश्वास नाही ते देशाचा आदर कसा करणार ? जे जामिनावर बाहेर आहेत त्यांचा कायदा आणि संस्थांवर विश्वास नाही अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली.

काँग्रेसच्या दृष्टीने सीबीआय, कॅग, आरबीआय सर्वच चुकीचे आहेत तेच फक्त बरोबर आहेत. ही संविधान आणि साम्राज्यामधली लढाई आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना त्यांनी यंत्रणांचा वापर करुन मला त्रास दिला. त्यांनी अमित शाहंनाही तुरुंगात टाकले असे नरेंद्र मोदी म्हणाले. अयोध्या खटल्यातही काँग्रेसने कायदेशीर प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस विरोधात जन्मलेले पक्ष आज फक्त भाजपाला दूर ठेवण्यासाठी काँग्रेससमोर शरणागती पत्करत आहेत.

२०१४ आधी बँकेकडून कर्ज घेण्याच्या दोन प्रक्रिया होत्या. एक सामान्य प्रक्रिया होती आणि एक होती काँग्रेस प्रक्रिया. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्ज देण्याची काँग्रेस प्रक्रिया बंद केली असे मोदी म्हणाले.

आधीच्या सरकारने शेतकऱ्यांकडे मतपेटी म्हणून पाहिले. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याची आधी ज्यांची जबाबदारी होती त्यांनी शॉर्टकटचे मार्ग अवलंबले. आम्ही अन्नदाता म्हणजे शेतकऱ्याला सशक्त बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. स्वामीनाथन आयोगाची शिफारस मंजूर केली. शेतकऱ्यांना खर्चाच्या दीडपट समर्थन मुल्य देत आहोत. सर्व समस्या दूर झाल्या असे मी म्हणणार नाही अजून भरपूर काही करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा भार आहे त्याची कल्पना आहे असे मोदींनी सांगितले.

१० टक्के आरक्षण नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारे आहे. आधीपासून लागू असलेल्या आरक्षणाशी छेडछाड न करता नवीन आरक्षण दिले. काही जण नव्या आरक्षणावरुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कारस्थान आपल्याला हाणून पाडायचे आहे असे मोदी म्हणाले.

एका व्यक्तीविरोधात सगळे एकजूट होत आहेत. विरोधकांना देशात मजबूत सरकार नको, मजबूर सरकार हवे आहे. जेणेकरुन त्यांना भ्रष्टाचार करता येईल. देशाला मजबूत सरकार हवे आहे पण विरोधकांना कुटुंब, नातेवाईकांचे भले करण्यासाठी संरक्षण डीलमध्ये दलाली खाण्यासाठी मजबूर सरकार हवे आहे असा आरोप मोदींनी केला.