उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी रात्री एका आठ महिन्याच्या गरोदर महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. १२ तासांपासून या महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा प्रयत्न करत असतानाच आठ रुग्णालयांनी या महिलेला दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने तिची मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उच्च रक्तदाबामुळे श्वास घेण्यास महिलेला त्रास होत होता. या प्रकरणामध्ये आता गौतमबुद्ध नगर जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

मृत महिलेचे नाव निलम असे असून ती ३० वर्षांची होती. गाझियाबादमधील खोडा येथे राहणाऱ्या महिलेचा पती विजेंद्र सिंह आणि भाऊ तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून धावपळ करत होते. या महिलेचा भाऊ शैलेंद्र सिंह याने सण्डे एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार तो त्याच्या भाऊजींबरोबर बहिणीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी फिरत होता. हे दोघेजण या महिलेला सहा वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये घेऊन गेले. मात्र तिला दाखल करुन घेण्यास सर्व रुग्णालयांनी नकार दिला. त्यानंतर या दोघांनी रुग्णवाहिकेमधून या महिलेला इतर दोन रुग्णालयांमध्ये नेलं तिथेही तिला दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. आमच्याकडे बेड उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आल्याचा आरोप शैलेंद्रने केला आहे.

शिवालिक रुग्णालय, ईएसआय रुग्णालय, शारदा रुग्णालय, ग्रेटर नोएडामधील सरकारी रुग्णालय,जयपी रुग्णालय, गौतम बुद्ध नगरमधील फोर्टीस रुग्णालय, गाझियाबादमधील वैशाली येथील मॅक्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी निलमच्या पतीने आणि भावाने दिवसभर तिला घेऊन धावपळ केली. मात्र रुग्णवाहिकेमध्येच या महिलेने प्राण सोडल्याचे सांगितले जात आहे. या महिलेला जवळजवळ १२ तासांनंतर ग्रेटर नोएडामधील गव्हर्मेंट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (जीआयएमएस) रुग्णालयामध्ये दाखल करुन व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

गौतमबुद्ध नगरचे जिल्हाधिकारी एल. व्हाय सुहास यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. “अतिरिक्त जिल्हाधिकारी नाथ उपाध्याय आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी दिपक ओरी हे या प्रकरणाची चौकशी करुन असून या प्रकरणात तातडीने चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” असं जिल्हाधिकारी कार्यालयामधून स्पष्ट करण्यात आलं आहे.  यापूर्वीही उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्ध नगरमध्ये २५ मे रोजी एका लहान मुलाचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता.