रेल्वेच्या प्रतीक्षा यादीतील तिकीट असेल, तर आता अशा प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी आसन आरक्षित झाले, तर त्याची माहिती त्यांच्या मोबाइलवर लघुसंदेश पाठवून कळवण्याची सोय रेल्वे करणार आहे.
आतापर्यंत रेल्वे प्रवास आरक्षणासाठी प्रतीक्षा यादीतील तिकीट खरेदी केल्यानंतर प्रवासाच्या तारखेपर्यंत निश्चित आसन आरक्षण मिळाले आहे किंवा नाही हे रेल्वेच्या संकेतस्थळावर जाऊन पाहावे लागत होते; परंतु आता तिकीट आरक्षण करतानाच भरून द्यायच्या अर्जामध्ये प्रवाशांनी आपले मोबाइल क्रमांक नमूद केले, तर प्रतीक्षा यादीतील तिकीट निश्चित आरक्षित झाले, तर त्यासंबंधीचा एसएमएस प्रवाशांना रेल्वेकडून पाठविला जाणार आहे. त्यामुळे इंटरनेट सुविधेचा दररोज वापर न करणाऱ्या प्रवाशांना या सुविधेचा उपयोग होणार असून आरक्षित प्रवास करायला मिळणार की नाही अशी धाकधूक लागून राहणार नाही. सध्या प्रतीक्षा यादीतील तिकीट आरक्षित झाले की नाही हे पाहण्यासाठी एक तर संकेतस्थळ पाहावे लागते किंवा १३९ या चौकशी क्रमांकावर फोन करून खात्री करावी लागते.
एकदा का एसएमएस आधारित ही सेवा सुरू झाली, की प्रवाशांना घरबसल्या आपले प्रतीक्षा यादीतील आरक्षण आता निश्चित झाल्याचे समजणार आहे. सीआरआयएस या रेल्वेच्या तंत्रज्ञानविषयक शाखेने यासाठी एसएमएस आधारित प्रणाली तयार केली आहे. आयआरसीटीसीने यापूर्वी मोबाइलद्वारे तिकीट आरक्षण व्यवस्था कार्यान्वित केली आहे.