पूंच्छ जिल्ह्य़ातील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळच्या भारतीय ठाण्यांवर गोळीबार करून पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा प्रत्यक्ष नियंत्रणरेषेचा भंग केल्याची बाब उघडकीस आली आहे. गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचा भंग झाला आहे. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळील कृष्णघाटी उपविभागातील नांगी तिकरी येथे सोमवारी रात्री पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय ठाण्यांवर गोळीबार केल्याची माहिती संरक्षण विभागाचे प्रसिद्धी अधिकारी एस. एन. आचार्य यांनी दिली. रात्री ८.१० ते ८.२०च्या दरम्यान हा गोळीबार सुरू होता. सीमारक्षणासाठी तैनात असलेल्या आपल्या सैनिकांनी त्यास प्रत्युत्तर दिले नाही. मात्र यामध्ये कोणीही जखमी झाले नाही, असे आचार्य म्हणाले.
सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवाद्याच्या घुसखोरीचा धोका लक्षात घेऊन या भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे.