पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पाकिस्तानचे सर्वोच्च नेते नव्हे तर हिजबुल मुजाहिद्दीनचे कमांडर असल्यासारखे बोलत होते, अशा शब्दांत भाजप नेते राम माधव यांनी टीका केली आहे. शरीफ यांनी भाषणादरम्यान उघडपणे बुरहान वानीसारख्या दहशतवाद्याचे समर्थन केले. त्यांच्या या भाषणामुळे आतापर्यंत भारताने शरीफ आणि पाकविरुद्ध केलेले आरोप एकप्रकारे सिद्ध झाल्याचे राम माधव यांनी म्हटले. पाकिस्तानला राजनैतिक आणि अन्य स्तरांवर सडेतोड प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकार योग्य ती पावले उचलेल आणि उरीतील हल्लेखोरांना माफ केले जाणार नाही, याचा मला विश्वास असल्याचेही राम माधव यांनी सांगितले. तसेच पाकिस्तान हे नकली राष्ट्र असून त्यांना फक्त शस्त्रांचीच भाषा कळते. पाकिस्तान आपल्याला शस्त्रास्त्रांनी धमकावत असेल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याची गरज असल्याचे राम माधव यांनी सांगितले.
दरम्यान, नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत केलेल्या भाषणात बुरहान वानी हा जम्मू काश्मीरमधील शांततेसाठी काम करणारा तरुण नेता असल्याचे म्हटले होते. तसेच काश्मीर प्रश्नावर तोडगा काढल्याशिवाय भारत – पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण होणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले होते. शरीफ यांच्या या विधानाला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी इनाम गंभीर यांनी पाकिस्तानची दहशतवाद्याबद्दलची दुटप्पी भुमिका जगासमोर मांडली. त्या म्हणाल्या, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना आमच्या देशाला करावा लागत आहे. पाकिस्तानच्या या भुमिकेचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. आत्मकेंद्रित भूमिकेमुळे पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र ठरत असल्याचे सांगत जगाकडून मिळणारी आर्थिक मदत पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी वापरत असल्याचा आरोप केला. पाकिस्तान हा सर्व पैसा ते भारताविरोधात दहशतवाद्यांना लढण्यासाठी दिला जातो. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या पैशांचा वापर करतात. अनेक दहशतवादी संघटना आणि त्यांचे नेते पाकिस्तानच्या सहकार्याने मुक्तपणे सगळीकडे वावरतात. अनेक दहशतवादी संघटना खुलेपणाने निधी गोळा करतात, याकडेही गंभीर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे लक्ष वेधले.