लोकसभेतील गदारोळानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिल्लीत पत्रकारपरिषद घेतली. परमबीर सिंग हे भ्रष्टाचारी अधिकरी आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसेच, परमबीर सिंग यांनी पोलीस अधिकारी अनुप डांगे यांना त्रास दिला असल्याचंही राऊत म्हणाले.

भाजपाच्या सदस्यांनी सभागृहात आज महाविकासआघाडी सरकारवर आरोप करण्याचा प्रयत्न केला. दुर्देवाने सभापतींनी मला एकट्यालाच केवळ एक मिनिट बोलण्याची संधी दिली. त्यामुळे परमबीर सिंग बद्दल जी महत्वाची बाब मला मांडायची होती. ती मांडायचा आम्ही प्रयत्न केला परंतू तिथं संधी मिळाली नाही म्हणून माध्यमांद्वारे सर्व जनतेसमोर आम्ही ती मांडत आहोत. असं खासदार राऊत यांनी सांगितलं.

आणखी वाचा- “…म्हणून विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीला आधारच नाही”, शरद पवारांनी पुन्हा केली गृहमंत्र्यांची पाठराखण!

यावेळी विनायक राऊत म्हणाले, ”हे परमबीर सिंग नावाचं जे रसायन आहे, हेच मुळात भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे. गावदेवी पोलीस स्टेशनला अनुप डांगे हे पोसीस अधिकारी होते, या अनुप डागेंनी २ फेब्रुवारी २०२१ रोजी, अॅडिशनल चीफ सेक्रेटरी होम डिपार्टमेंट महाराष्ट्र यांना एक पत्र लिहिलेलं आहे. परमबीर सिंग यांनी भरत शहा व जितेंद्र चंदरलाल नवलानी या अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या या लोकांची बाजू घेऊन, परमबीर सिंग यांनी अनुप डांगे यांना कशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला. ही सर्व बाजू त्यांनी त्यांच्या तक्रारीत मांडलेली आहे. किंबहुना एक पब बंद करायला गेलेल्या अनुप डांगे यांना परमबीर सिंग यांनी रात्री दोन-अडीच वाजता फोन केला व केस रजिस्टर करू नको असं सांगितलं. तरी देखील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनुप डांगे यांनी ते जे बेकायदेशीर काम सुरू होतं, त्याच्यावर पूर्णपणे कारवाई केली व केस रजिस्टर केली. ही केस रजिस्टर करत असताना त्यांनी भर शहा आणि जितेंद्र चंरलाल नवलानी यांचे देखील नाव त्यामध्ये नमूद केलं. पोलीस डायरी तशी तयार केली आणि त्यामुळे हा चंदरलाल नवलानी अनुप डांगे यांना म्हणतो की, परमबीर सिंग व आमचे घरचे संबंध आहे. आमचे खूप जवळचे संबंध आहे, तुम्ही जर आज आमच्यावर कारवाई केली. तर उद्या आम्ही तुम्हाला दाखवू की परमबीर सिंग आमचे घरचे व्यक्ती आहे.दुर्देवाने त्याच परमबीर सिंग यांनी मध्यरात्रीपासून म्हणजे पहाटे ४ वाजेपासून ते दुसऱ्या दिवशीपर्यंत या अनुप डांगे यांना त्रास द्यायला सुरूवात केली. त्यांच्याकडून जो काही त्रास दिला जात होता, अनुप डांगे यांनी पोलीस स्टेशन डायरीत नोंद करून ठेवलेला आहे. परमबीर सिंग यांच्या नावानिशी नोंद करून ठेवलेला आहे.”

आणखी वाचा- भाजपाला मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्र तोडायचाय; पंजाबमधील खासदाराचा लोकसभेत हल्लाबोल

तसेच, ”परमबीर सिंग व भरत शहा यांची संबंध ज्या पद्धतीचे होते, ते सुद्धा या पत्रात त्यांनी नमूद केलेले आहेत. एवढंच नव्हे ताबडोत ज्या दिवशी परमबीर सिंग यांच्याकडून अनुप डांगे यांना फोन येत होता, दमदाटीची भाषा केली जात होती, माझं जर ऐकलं नाहीतर कारवाई करू असं सांगितलं जात होतं. त्या प्रत्येक वेळी अनुप डांगे यांनी पोलीस स्टेशनच्या डायरीत नोंद केलेली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईच्या आयुक्त पदावरून हटवल्यानंतर उशीरा सूचलं शहाणपण परमबीर सिंग यांनी जे काही अकलेचे तारे तोडले आहेत, तसं अनुप डांगे यांचं नाही. अनुप डांगे यांनी त्या त्या दिवशी परमबीर सिंग यांच्याकडून जो काही त्रास होत होता, परमबीर सिंग ज्या पद्धतीने पब व इतर बेकायदेशीर बाबींना पाठीशी घालण्यासाठी जे प्रयत्न करत होते. अनुप डांगेंसारख्या आणखी अधिकाऱ्यांना त्रास देत होते, हे सर्व डांगे यांनी आपल्या पत्रात लिहिलेलं आहे.” असं देखील खासदार राऊत म्हणाले.

तसेच,  ”आम्ही आज हे स्पष्टपणे आरोप करतो आहे, मागील १४- १५ महिन्यांपासून महाराष्ट्रावर कावळ्यासारखा डोळा ठेवून बसलेल्या भाजपाच्या लोकांना, राजकारणातील कपटनिती जी त्यांनी आजपर्यंत केली, ती यशस्वी झाली नाही. म्हणून, आता परमबीर सिंग यांच्या माध्यमातून बोलतं करण्यात आलं आहे. परमबीर सिंग हा खऱ्या अर्थाने केंद्र सरकारचा बोलका पोपट आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही केलेली आहे.” असा आरोपही  विनायक राऊत यांनी यावेळी केला.