पुलवामा हल्ल्यानंतर अनेक वादग्रस्त वक्तव्ये राजकीय व्यक्तींकडून केली जात आहेत. यात आता केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते गिरीराज सिंह यांनी पुन्हा एकदा असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुलवामा हल्ल्यावरुन नसरुद्दीन शाह आणि कमल हसन यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.


सिंह म्हणाले, पाकिस्तानात गजवा-ए-हिंदची चर्चा होत होती. याचा अर्थ भारताचे इस्लामीकरण असा होता. पुलवामा हल्ल्यानंतर याला गती मिळाली आहे. आपले दुर्देव आहे की, भारतात नसरुद्दीन शाह आणि कमल हसन सारखे लोक पाकिस्तानचे एजंट बनले आहेत. जे ही गजवा-ए-हिंदची भाषा करतात.

यापूर्वी गिरीराज सिंह यांनी पंजाब सरकारचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, सिद्धू राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरुन अशी विधाने करीत आहेत. काँग्रेसकडून मतांसाठी अशी विधाने होत आहेत. सिद्धू यांचे विधान लोकशाहीसाठी नव्हे तर मतशाहीसाठी आहे. मात्र, भारतीय सेनेच्या शौर्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असेही ते यावेळी म्हणाले.