देशातील पेट्रोल पंप रात्रीच्यावेळी बंद ठेवण्याचा पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांचा प्रस्ताव पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारी फेटाळला. 
तेलाच्या वाढत्या आयातीला पायबंद घालण्याचा उपाय म्हणून देशभरातील पेट्रोलपंप रात्री बंद ठेवण्याचा प्रस्ताव वीरप्पा मोईली यांनी ठेवला होता. रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत देशातील पेट्रोल पंप बंद ठेवल्यास इंधनाची मागणी कमी होईल, असा तर्क या प्रस्तावामागे होता. तेलाची आयात कमी करण्यासाठी विचारार्थ असलेल्या अनेक पर्यायांमध्ये पेट्रोलपंप रात्री बंद करण्याचा पर्याय असल्याचे मोईली यांनी म्हटले होते. मात्र, पेट्रोल पंप रात्री बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर विरोधकांनी कडाडून टीका केली होती. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांनीही त्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यापार्श्वभूमीवर हा प्रस्ताव पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी फेटाळला आहे.