बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची दरभंगा येथे रॅली पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या उभारणीवरून विरोधकांना टोला लगावला. “आज सर्वांची नजर अयोध्येवर आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तपस्येनंतर आता राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरू झालं आहे. राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजानं टाळ्या वाजवत आहेत,” असं मोदी म्हणाले.

दरभंगा येथील रॅलीदरम्यान मोदींनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीवरही भाष्य केलं. “प्रत्येक शेतकऱ्या थेट बँक खात्यात आम्ही मदत पोहोचवणार असल्याचं सांगितलं होतं. आतापर्यंत जवळपास एक लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. आम्ही गरीबांना बँक खाती देऊ असं सांगितलं होतं. आज जवळपास ४० कोटी गरीबांची बँक खाती उघडली आहेत. आम्ही उज्ज्वला योजनेचीही घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत बिहारमधील जवळपास ९० लाख महिलांना लाकडाच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले. आम्ही प्रत्येक गरीब व्यक्तीला ५ लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार देण्याची घोषणाही केली होती. आज बिहारच्या प्रत्येक गरीब व्यक्तीला याचा लाभ मिळत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- … तर लोक मोदींना हाकलून लावतील; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

आणखी वाचा- निवडणुकीनंतर नितीश कुमार पुन्हा भाजपाला धोका देतील; चिराग पासवान यांचा हल्लाबोल

“पैसे हजम केले की परियोजना संपली असं यापूर्वीच्या सरकारचं धोरण होतं. त्यांनी ‘कमिशन’ या शब्दावर अतिशय प्रेम होतं. म्हणून त्यांनी कनेक्टिव्हीटी यावर लक्ष दिलं नाही. केंद्रात एनडीएचं सरकार आल्यानंतर कोसी महासेतूचं काम जलद गतीनं सुरू झालं. काही दिवसांपूर्वी कोसी महासेतूचं लोकार्पण करण्याचं भाग्य मला लाभलं. यामुळे ३०० किलोमीटरचं अंतर २०-२२ किलोमीटरवर आलं. आता ८ तासांचा प्रवास अर्धा तासात पूर्ण होत आहे,” असंही मोदी म्हणाले.