भारत आणि पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांमध्ये चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगतानाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र पाठवून चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. भारत- पाकिस्तान संबंधावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, दोन्ही देशांमध्ये सातत्याने चर्चा होणे गरजेचे आहे. शेवटी आपण शेजारी राष्ट्र आहोत. दोघांमध्ये प्रलंबित वाद असून चर्चेशिवाय पर्याय नाही. तसेच अतिधाडस दाखवूनही उपयोग नाही, असे त्यांनी सांगितले. भारत - पाकमधील वाद गुंतागुंतीचे असून ते सोडवताना असंख्य अडथळे येतील. पण संवादाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली पाहिजे. काश्मीरमधील परिस्थितीही स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. वस्तूस्थिती स्वीकारुन भारत - पाकिस्तानने पुढे गेले पाहिजे, असे नमूद करतानाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र पाठवून चर्चेची तयारी दर्शवल्याचा दावाही त्यांनी केला. "India and Pakistan have to move forward keeping realities before them,"Pakistan Foreign Minister SM Qureshi asserted, adding that Indian PM Narendra Modi has written a letter to PM Imran Khan in which he indicated beginning of talks between the two countries:Geo News pic.twitter.com/ngUEuNriKs — ANI (@ANI) August 20, 2018 दरम्यान, पाकिस्तानच्या दाव्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठवले होते. यात चर्चेबाबतच्या प्रस्तावाचा उल्लेख नव्हता. आता परराष्ट्र मंत्रालय पाकच्या या दाव्यावर अधिकृत प्रतिक्रिया कधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर इम्रान खान यांनी भारताशी चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. शांततेसाठी भारताने एक पाऊल टाकले तर आम्ही दोन पावले पुढे टाकू, असे त्यांनी सांगितले होते.