काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचं रविवारी पुण्यात निधन झालं. फुफ्फुसात संसर्ग झाल्यानं त्यांची प्रकती बिघडली आणि रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. राजीव सातव निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात असून, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मी मित्र गमावला, आपल्या सर्वांचे एक मोठं नुकसान झालं” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. तर राजीव सातव यांच्या जाण्याने प्रतिभाशाली सहकारी गमावला असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे.

राजीव सातव यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी ट्विट करून सातव यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

“माझा मित्र राजीव सातव गेल्याने मला फार दुःख झाले आहे. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती. काँग्रेस पक्षाच्या आदर्शांना मूर्त रूप देणारा तो नेता होता. हे आपल्या सर्वांसाठी एक मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवदेना व्यक्त करतो,” असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.

“राजीव सातव यांच्या जाण्याने आम्ही आमचा एक प्रतिभाशाली सहकारी गमावला. निर्मळ मनाचा, प्रामाणिक, काँग्रेसच्या आदर्शांशी वचनबद्ध आणि भारतीय जनतेसाठी समर्पित असा नेता. माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत, त्याच्या पत्नीसाठी आणि मुलांसाठी फक्त प्रार्थना. त्यांच्याशिवाय जगण्याचे सामर्थ्य त्यांना मिळो”, असे ट्वीट प्रियांका गांधी यांनी केले आहे.

काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचे रविवारी सकाळी निधन झाले. गेल्या २३ दिवसांपासून राजीव सातव झुंज देत होते. त्यांनी करोनावर मात केली होती. मात्र, त्यानंतर सायटोमॅजिलो या विषाणूची लागण झाल्याने त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. दरम्यान सकाळी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.