काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र व तेलंगणचा दौरा करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या या दोन राज्यांमध्ये झाल्या आहे. राहुल सुटीवरून परतल्यानंतर सक्रिय झाले आहेत. संसदेत या आठवडय़ात दोन वेळा त्यांनी चर्चेत सहभाग घेतला.
राहुल यांनी या आठवडय़ात केदारनाथ मंदिराला भेट दिली. त्यांच्या दौऱ्यांची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दौऱ्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरी जाणे किंवा पदयात्रा असा दौऱ्याचा कार्यक्रम असेल. राहुल यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या पुढील समस्या हा मुद्दा प्राधान्याने असेल असे सूत्रांनी सांगितले.  राहुल यांचे अधिक ऐकून घेतले पाहिजे तसेच ते सक्रिय झाले पाहिजेत अशी अपेक्षा यापूर्वी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली होती. आता ते सक्रिय झाल्याचे दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले.