राहुल गांधीनी आज गुजरातमधील जाहीर सभेत नरेंद्र मोदी हे देशातील जनतेला मूर्ख बनवत असल्याचे सांगितले. केंद्रसरकारकडून गुजरातमधील आदिवासींच्या विकासासाठी देण्यात आलेल्या ५५ हजार कोटींच्या पॅकेजचे काय झाले असा सवाल राहुल गांधीनी या सभेत उपस्थित केला. संपूर्ण गुजरात राज्यात १३००० शाळा बंद पडल्या असून विकासाचा टेंभा मिरवणा-या मोदींकडे या प्रश्नाचे उत्तर द्यावे. तसेच गुजरातचा विकास हा कोण्या एका व्यक्तीमुळे झाला नसून गुजराती जनतेच्या मेहनतीमुळे शक्य झाल्याचे सांगितले. काँग्रेस पक्ष देशातील गरिबांचे प्रतिनिधित्व करणारा असून आगामी काळात गरिबांच्या विकासासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राहुल गांधींनी या सभेत दिले. काँग्रेस देशातील गरिबी हटवण्याचासाठी  प्रयत्न करत असताना भाजप मात्र गरिबांनाच हटवण्याचे काम करत असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी हाणला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना संघाची विचारसरणी देशात विष पसरवण्याचे काम करत असून अशाप्रकारची विचारसरणी महात्मा गांधींच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे राहुल गांधींनी सांगितले.