रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी देशातील बेरोजगारांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये चार लाख पदांसाठी भरती केली जाईल अशी घोषणा गोयल यांनी केली आहे. येत्या दोन वर्षांमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण 4 लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत भरती केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.


 
गोयल म्हणाले, गेल्या वर्षात आम्ही दीड लाख पदांची भरती केली. अजून 2 लाख 30 हजार कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या जाणार आहेत. सध्या रेल्वेत 1 लाख 32 हजार पदं खाली आहेत. येत्या दोन वर्षांमध्ये 1 लाख कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे जुन्या सी आणि डी श्रेणीतील जागा व आता भरती होणाऱ्या जागा अशा मिळून येत्या दोन वर्षांमध्ये रेल्वेत सुमारे 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल असं गोयल म्हणाले.

दोन टप्प्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख 31 हजार 428 पदांसाठी फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात जाहिरात काढली जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात 99 हजार पदांसाठी मे-जून महिन्यात जाहिरात काढली जाईल. दरम्यान, 2 लाख 30 हजार नवीन जागांच्या भरतीमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या उमेदवारांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे.