देशाची राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारला राजधर्माचे पालन करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता राजधर्मावरुन आरोप-प्रत्यारोपाचे जोरदार राजकारण सुरु झाले आहे. काँग्रेसने राजधर्माच्या नावाखाली लोकांना भडकवण्याचे काम करु नये, असे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद शुक्रवारी म्हणाले. त्यानंतर आता काँग्रेसचे दिग्गज नेते कपिल सिब्बल यांनी पलटवार केला आहे.

“कायदा मंत्री काँग्रेसने राजधर्म शिकवू नये असे सांगतात. आम्ही तुम्हाला कसे शिकवू शकतो? जेव्हा तुम्ही गुजरातमध्ये वाजपेयींचा सल्ला ऐकला नाही, तर आमचे तुम्ही कुठे ऐकणार? ऐंकण, शिकणं आणि राजधर्माचे पालन करणे हे गुण तुमच्या सरकारमध्ये नाहीत” असे टि्वट कपिल सिब्बल यांनी केले आहे.

२००२ साली गुजरातमध्ये जातीय दंगली झाल्या होत्या. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीं यांनी त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्माचे पालन करण्याची आठवण करुन दिली होती.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन, सरकारला राजधर्माचे पालन करायला सांगा अशी मागणी केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या भाजपाने काँग्रेसने राजधर्मावरुन लोकांना भडकवू असे म्हटले. त्यानंतर आता राजधर्मावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.