अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनाकडे सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. भूमिपूजनासाठी सध्या जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. अयोध्येचे उप महानिरीक्षक दीपक कुमार यांनी अयोध्येमधील सुरक्षेची माहिती देताना कोविड प्रोटोकॉल पाळला जाणार असून पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल अशी माहिती दिली आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी अयोध्येमधील सुरक्षेची माहिती दिली.

दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अयोध्या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी सुरक्षेचा प्रोटोकॉल फॉलो केला जाणार आहे. कोविड प्रोटोकॉलही फॉलो केला जाणार आहे. कोविड योद्धाही तिथे उपस्थित असणार आहेत. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास बंदी आहे. शहरातील दुकानं सुरु असतील”.

“आम्ही ड्रोनच्या माध्यमातून व्हीआयपी मार्गांवर नजर ठेवत आहोत. अयोध्येत राहत असलेल्या लोकांना शहरात फिरण्यावर बंदी नसेल. पण गरज नसल्याशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन लोकांना करण्यात आलं आहे. बाहेरील लोकांना शहरात प्रवेशबंदी असेल,” असं दीपक कुमार यांनी सांगितलं आहे.