कानपूरच्या एका मुस्लीम महिलेने उर्दू भाषेत रामायण लिहिले आहे. मुस्लीम समाजालाही रामायणातील चांगल्या गोष्टींबद्दल माहिती व्हावी हा यामागील उद्देश असल्याचे या महिलेने म्हटले आहे. त्यामुळे सदर महिलेने सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उदाहरण देशासमोर ठेवले असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सदर महिलेचे नाव डॉ. माही तलत सिद्दिकी असे असून त्या कानपूरच्या प्रेमनगर येथे राहतात. कानपूर येथील बद्री नारायण तिवारी यांनी त्यांना दोन वर्षांपूर्वी रामायणाची प्रत भेट दिली होती. रामायण वाचल्यानंतर हे महाकाव्य उर्दू भाषेत लिहावे, असा त्यांनी निर्धार केला. रामायणामध्ये शांती आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला आहे आणि ते उर्दूत लिहिल्यानंतर आपण तणावमुक्त झालो असल्याचे डॉ. सिद्दिकी यांनी म्हटले आहे.

उर्दू भाषेत रामायण लिहिण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागला. हिंदी भाषेतील रामायणाचा भावार्थ बदलू नये याकडे विशेष लक्ष द्यावे लागले. काही जण धार्मिक मुद्दय़ांवर चिथावणी देऊन हिंसा पसरविण्याचे काम करतात, मात्र कोणताही धर्म द्वेषाची शिकवण देत नाही, असेही त्या म्हणाल्या. यापुढे लेखणीद्वारे सामाजिक ऐक्य घडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.