जोपर्यंत लाभार्थ्यांना आरक्षणाची गरज भासेल तोपर्यंत आरक्षण सुरुच ठेवायला हवे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून व्यक्त करण्यात आले आहे. राजस्थानातील पुष्कर येथे संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक पार पडली. यावेळी तिसऱ्या व अंतिम दिनी आरक्षणावर चर्चा झाली यावेळी संघाचे संयुक्त महासचिव दत्तात्रय होसबळे यांनी आपले विचार व्यक्त केले.

आरक्षण अनिश्चित काळासाठी सुरु रहायला नको, असे संघाला वाटते का? या प्रश्नाला उत्तर देताना होसबळे म्हणाले, “याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आरक्षणाच्या लाभार्थ्यांना आहे. आपल्याला आरक्षणाची आवश्यकता आहे कारण समाजात सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे. त्यामुळे आरक्षण तोपर्यंत कायम ठेवायला हवे जोपर्यंत याचा लाभ घेणाऱ्यांना त्याची गरज वाटते आहे.”

होसबळे म्हणाले, “मंदिर, स्मशानभूमी आणि जलाशये सर्व जाती आणि वर्गांसाठी खुले व्हायला हवेत. कोणत्याही विशिष्ट जातीच्या व्यक्तीला तिथे जाण्यापासून प्रतिबंध करता कामा नये. संविधानाद्वारे निश्चित केलेल्या आरक्षण व्यवस्थेला रा. स्व. संघ पूर्णपणे समर्थन आहे.” एका दलित संघटनेच्या प्रमुखाने संघप्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहून समाजातील भेदभाव संपवण्याच्या संघाच्या प्रयत्नांचे कौतुक केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, संघाच्या या बैठकीत पहिल्यादिवशी आसाममध्ये एनआरसीच्या अंतिम यादीतून अनेक भारतीय नागरिकांना बाहेर ठेवण्यात आल्याप्रकरणी चिंता व्यक्त करण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्याप्रकरणी चर्चा झाली होती.