राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा लोकांना फसवण्यासाठी आपण बदललो आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. We or our nationhood defined हे पुस्तक संघाच्या शिबिरात आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये वाचायला दिलं जातं व हे पुस्तक संघाचं गॉस्पेल आहे असं आंबेडकर म्हणाले. या देशात हिंदू हा राष्ट्रीय धर्म असून इतर धर्मांनी दुय्यम भूमिका स्वीकारावी अशी भाषा या पुस्तकात आहे असा दाखला त्यांनी दिला आहे. भागवतांना संविधानाची तत्वं मान्य नसून त्यांना गोळवलकर यांचे विचार मान्य असल्याचे आंबेडकरांनी सांगितले. मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मोहन भागवत यांची तीनदिवसीय परिषद तसेच भारिपची एमआयमबरोबरची युती यासंदर्भात आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली. आर्यन रेसची थिएरी आरएसएसला मान्य असून आम्ही सुपीरीअर आहोत अशी यांची भूमिका आहे असा आरोप त्यांनी भागवतांवर केला आहे. इतरांना किती दिवस या देशात ठेवावं याचा निर्णय हिंदुंनी घ्यावा आणि जे बाहेर जाणार नाहीत त्यांचा नरसंहार केला जाईल अशी भाषा या पुस्तकात आहे असं आंबेडकर म्हणाले. आरएसएस इथल्या कोणत्याही कायद्याला मानत नाहीत असा आरोप करतानाच सध्या भागवत संघाच्या कार्यकर्त्यांविरोधात बॅकलॅश येऊ नये याकरता प्रयत्न करत असल्याची संगती आंबेडकरांनी लावली आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींवरही आंबेडकरांनी टिका केली आहे. पंतप्रधान व राष्ट्रपती नागपूरहून समन्स बजावल्यासारखे नागपूरला जातात, असा चिमटा त्यांनी नरेंद्र मोदी व रामनाथ कोविंद यांना काढला आहे.