पाटण्यामध्ये साखळी बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्थेत गंभीर त्रुटी होत्या, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सोमवारी केला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची रविवारी पाटण्यातील गांधी मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेच्या ठिकाणी कमी तीव्रतेचे सहा स्फोट झाले. त्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी राज्यातील सुरक्षाव्यवस्थेवर बोट ठेवले.
सुरक्षाव्यवस्थेत गंभीर त्रुटी होत्या, त्याबद्दल शंका घेण्याचे अजिबातच काही कारण नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दूरध्वनी करून माझ्याशी चर्चा केली आणि घडल्या प्रकाराबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. एक ते दोन दिवसांत या घटनेबद्दलची सर्व माहिती जमविण्यात येईल, असे आश्वासन नितीशकुमार यांनी मला दिल्याचे राजनाथ सिंह यांनी पत्रकारांना सांगितले.
पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे स्वतः सभेमध्ये भाषण करणार असल्याने बिहार पोलीसांनी अधिक खबरदारी घ्यायला हवी होती. सभेला आलेल्या लोकांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी काळजी घ्यायला हवी होती, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
स्फोटांनंतर बिहारमधील लोकांनी शांतता राखल्याबद्दल त्यांनी तेथील जनतेचे आभार मानले आहेत.