करोना लसीच्या परिणामकारकतेच्या मुद्यावरुन सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या प्रमुखांमध्ये झालेल्या शाब्दिक वादानंतर आता दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. लस उपलब्ध करुन देण्यासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प दोन्ही कंपन्यांनी बोलून दाखवला आहे.

“भारतातील तसेच जगातील लोकांचे प्राण आणि उपजीविका वाचवणे सध्याच्या घडीला महत्त्वाचे लक्ष्य आहे. लसीमध्ये लोकांचे प्राण वाचवण्याची तसेच अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्याची ताकद आहे” असे अदर पूनावाला आणि डॉ. कृष्णा इल्ला यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

“जनतेला चांगल्या दर्जाची, सुरक्षित आणि परिणामकारक लस उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. लसीचे उत्पादन, पुरवठा आणि वितरणावर लक्ष केंद्रित करणार आहोत” असे सिरम आणि भारत बायोटेकने म्हटले आहे.

नेमका वाद काय?
फायझर, मॉडर्ना आणि आणि ऑक्सफर्डच्या लशी वगळून अन्य लशी ‘केवळ पाण्याइतक्या सुरक्षित’ अशी टीका ‘सीरम’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी केली होती.

त्यानंतर भारत बायोटेकने सोमवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. लशीच्या २०० टक्के प्रामाणिक चाचण्या केल्या आहेत, आमच्यावरील टीका अनाठायी आहे, असे कंपनीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले. ‘‘आम्ही २०० टक्के प्रामाणिकपणे लशीच्या चाचण्या केल्या असूनही आमच्यावर टीका करण्यात येते” असे भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा इल्ला म्हणाले.