अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख निश्चित झालेली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी होणार आहे. ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळेविषयी शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी शंका उपस्थित केली आहे. भूमिपूजनासाठी निश्चित करण्यात आलेली वेळ अशुभ असल्याचं शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राम मंदिराच्या कामाला अखेर सुरूवात झाली आहे. अयोध्येत सध्या मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असून, पुढील महिन्यात ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. भूमिपूजनाचा सर्व कार्यक्रम निश्चित झालेला असताना शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी आपलं मत मांडलं आहे.

“आम्हाला कोणतेही पद नको किंवा राम मंदिराचे विश्वस्थही व्हायचे नाहीये. आमची इतकीच इच्छा आहे की, मंदिराचं काम व्यवस्थित व्हायला हवं आणि योग्य वेळी पायाभरणी करायला हवी. पण, सध्याची ही वेळ अशुभ वेळ आहे,” असं शंकराचार्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांचे मंदिर जनतेच्या पैशातून उभारले जाणारा आहे, तर मंदिराच्या बांधकामासंदर्भात लोकांचीही मतं जाणून घ्यायला हवीत, असं त्यांनी म्हटलं आहे.

पायाभरणीचा कार्यक्रम भव्य दिव्य पद्धतीने साजरा केला जाणार असल्याची माहिती राम मंदिर उभारण्याची जबाबदारी असणाऱ्या राम मंदिर ट्रस्टने दिली आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान १५० निमंत्रितांसह एकूण २०० जणं उपस्थित राहणार आहेत.