जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्हय़ात झालेल्या गोळीबाराच्या चौकशीचे आदेश केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले असून कोणत्याही दलाच्या वापरामध्ये अतिरेक झाल्यास त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
रामबन येथे गोळीबार करण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या त्याची चौकशी विनाविलंब करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बळाचा वापर करताना अतिरेक झाल्याचे अथवा बेजबाबदारपणा आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
गोळीबाराची घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करून शिंदे यांनी, या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांकडे सहवेदना व्यक्त केल्या आहेत. जनतेला शांत राहण्याचे आवाहनही गृहमंत्र्यांनी केले आहे.