राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपचा सर्वात जुना सहकारी असलेल्या शिवसेनेने जमीन अधिग्रहण विधेयकावरून लोकसभेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
‘सब का साथ-सब का विकास’ अशी घोषणा करणाऱ्यांना (भाजप) शेतकऱ्यांना सोबत घेण्याची गरज वाटत नाही का, अशा शब्दात खासदार अरविंद सावंत यांनी भाजपला सभागृहात सुनावले. सरकारने पंतप्रधान सिंचन योजना घोषित केली असली तरी सिंचन करण्यासाठी जमीनच नसेल तर या योजनेचे काय होईल, असा प्रश्न सावंत यांनी सभागृहात विचारला. शेतकऱ्यांच्या हिताच्या घोषणा होत असताना जमीन अधिग्रहण कायद्याच्या निर्मितीत शेतकऱ्यांना विचारण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या मनात (सरकारविरोधात) भीती निर्माण झाली आहे, असे सावंत म्हणाले. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे ‘रालोआ’स हादरे बसू लागले आहेत. सरकारमध्ये अनेक कामे लोकशाहीला धरून होत नसल्याचा गंभीर आरोप सावंत यांनी केला.
शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमकतेमुळे केंद्र सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे. काल झालेल्या रालोआच्या बैठकीत यावर चर्चा झाल्यानंतरही शिवसेनेने आपली भूमिका कायम ठेवली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावर बोलताना खा. सावंत यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गेल्या दहा वर्षांपासून सुट्टीवर असलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठीच केंद्र सरकारने अध्यादेश आणले. मात्र त्याचा विपर्यास करण्यात आल्याची टीका संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांवर केली. केंद्र सरकारच्या कारभाराला ‘अध्यादेश राज’ हिणवणाऱ्या विरोधकांचा खरपूस समाचार घेताना नायडू यांनी जमीन अधिग्रहण विधेयकावर कोणत्याही चर्चेस सरकार तयार असल्याची ग्वाही दिली.

विरोधकांच्या रागाचा भडका
काँग्रेसचा कारभार सर्वात वाईट होता. अनेक कायदे प्रलंबित होते. काँग्रेसच्या ६२ वर्षांच्या कार्यकाळात आतापर्यंत ६३७ अध्यादेश आणल्याची माहिती त्यांनी सभागृहात देताच काँग्रेस सदस्यांच्या रागाचा भडका उडाला. अशा रीतीने आम्हाला अपमानित करता येणार नाही, असे खडसावत काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला. त्या वेळी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे हित जपले जाईल, याचा वारंवार उच्चार नायडू करीत होते. चर्चेत सहभागी होणारे समाजवादी पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायम सिंह यादव यांनी, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘सब का साथ सब का विकास’ ची ग्वाही देणाऱ्या केंद्र सरकारने अध्यादेश आणून केवळ निवडक उद्योजकांचे हित साधले नाही का, असा खोचक प्रश्न विचारला. मुलायमसिंह यादव यांच्या पुतण्याच्या विवाह समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. त्यावरून बिहार व उत्तर प्रदेशमधील प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेचा संदर्भ देत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न यादव यांनी केला. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत; भाजपचे नाहीत. त्यामुळे त्यांना पंतप्रधान या नात्यानेच निमंत्रण धाडल्याचे ते म्हणाले.