जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचा देशात उद्रेक झाल्याचे दिसत आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात ६० हजार ९६३ करोनाबाधित आढळले. तर, ८३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यावरून देशात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही झपाट्याने सुरू असल्याचे दिसून येत आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या आता २३ लाख २९ हजार ६३९ वर पोहचली आहे.

देशभरातील २३ लाख २९ हजार ६३९ करोनाबाधितांच्या संख्येत, अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ६ लाख ४३ हजार ९४८ असून, १६ लाख ३९ हजार ६०० जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. तर, आतापर्यंत ४६ हजार ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर ११ ऑगस्टपर्यंत २,६०,१५,२९७ नमूने तपासले गेल आहेत. यातील ७ लाख ३३ हजार ४४९ नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

करोनावरील लस देण्याची संभाव्य प्रक्रिया व नियमांबाबत चर्चा करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ समितीची बैठक आज (बुधवार) होणार आहे. त्यात कोविड-१९ लस उत्पादन, पुरवठा व्यवस्था व इतर नैतिक बाबींवरही उहापोह करण्यात येईल. लस देण्याच्या वेळी कुणाला अग्रक्रम द्यायचा, लशीचा पुरवठा कसा असेल अशा अनेक बाबींवर ही समिती विचार करणार आहे. राज्ये, लस उत्पादक कंपन्या यांच्याशीही समिती चर्चा करणार आहे. लसनिर्मितीनंतर ती कुणाला आधी द्यायची, शीतेपटय़ांची व्यवस्था कशी करायची, लस टोचणाऱ्यांना प्रशिक्षण कसे द्यायचे याचा विचार आधीच करण्याचे समितीने ठरवले आहे.