हलाला निकाह आणि तिहेरी तलाकने पीडित असलेल्या ३५ महिलांनी हलाला ही कुप्रथा बंद व्हावी यासाठी पावले उचलण्याची याचना सरकारकडे केली आहे. सोमवारी एक पत्रकार परिषद घेऊन या महिलांनी सरकार दरबारी आपले गाऱ्हाणे मांडले. शरियत कायद्याच्या नावाखाली सुरु असलेला हा प्रकार म्हणजे शोषणाशिवाय काहीही नाही असे पीडितांपैकी एक सबिना हीने म्हटले आहे. या हलाला प्रकारामुळे सबिनावर झालेल्या अत्याचाराप्रकरणी पोलिसांत तक्रारही नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर आता सरकारने या प्रकरणी लक्ष घालून ही प्रथा बंद करावी अशी मागणी तिने केली आहे. तलाक पीडित सबिनाची कहानी अतिशय दुखःद आहे. सबिनाचे २००९मध्ये वसीम हुसैनसोबत झाले होते. लग्नानंतर २ वर्षांनंतरही मुल होत नसल्याचे कारण देत तिच्या पतीने तिला तलाक दिला. त्यानंतर पुन्हा लग्नाची गळ घालत तिचा सासरा जमील हुसैन याच्यासोबत तिचा हलाला करण्यात आला. त्यानंतर आश्वासन दिल्याप्रमाणे तिच्या पतिने पुन्हा तिच्याशी लग्न केले. मात्र, २०१७ मध्ये पुन्हा तिला तलाक दिला. त्यानंतर पुन्हा तिला लग्नाची मागणी घातली आणि आपल्या भावासोबत हलाला करण्याची अट घातली. मात्र, वारंवार होत असलेल्या अत्याचाराला कंटाळलेल्या सबिनाने या हलालाला नकार दिला. आपल्या बहिणीच्या घरी राहणाऱ्या हलालाने पति वसीमच्या अटी पूर्णपणे नाकारल्या आहेत. तसेच या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. त्यामुळे तिला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. सबिना ही एकटीच अशी महिला नाही जी मुस्लिम समाजातील हलाला या कुप्रथेची शिकार बनली आहे. तर देशात दररोज कित्येक मुस्लिम महिलांना याचा सामना करावा लागत आहे. मात्र, शरियतच्या नावाखाली सुरु असलेली ही प्रथा पाळण्यासाठी समाजाचा मोठा दबाव असल्याने त्या आपला आवाज उठवू शकत नाहीत.