तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता अम्मा यांच्यावरील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने गेल्या वर्षी विरोधात निकाल दिल्यानंतर त्यांच्या २४४ समर्थकांनी आत्महत्या केली होती, या लोकांच्या कुटुंबीयांना ७ कोटी रुपये भरपाई देण्यात आली आहे, असे अद्रमुकने म्हटले आहे. दरम्यान अलीकडेच जयललिता यांची कर्नाटक उच्च न्यायालयाने ११ मे रोजी बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपातून मुक्तता केली. आतापर्यंत आत्महत्या करणाऱ्या लोकांना ७.३२ कोटी रुपये वाटण्यात आले आहे. चार जणांना वैद्यकीय उपचारांसाठी दोन लाख रुपये देण्यात आले आहेत असे पक्षाच्या निवेदनात म्हटले आहे. एकूण पक्षाने ७.३४ कोटी रुपये वाटले आहेत. अद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपये भरपाई जाहीर केली होती. लोकांनी आत्महत्या करू नयेत असे आवाहनही जयललिता यांनी केले होते. कनिष्ठ न्यायालयाने गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांना  ६६.६६ कोटी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा दिली होती.