गुप्तचरांच्या इशाऱ्यानंतर केरळ किनाऱ्यावर पोलिसांकडून दक्षता 

श्रीलंकेतून आयसिसचे १५ दहशतवादी बोटीतून लक्षद्वीपकडे निघाल्याची गुप्तचर माहिती मिळाली असून केरळ किनारी सतर्कता बाळगण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

किनारी पोलीस स्टेशनच्या प्रमुखांना संशयित बोटींवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशी गुप्तचर माहिती मिळणे हा नेहमीचाच भाग असून या वेळी दहशतवाद्यांची संख्या व ते कुठे जाणार आहेत ते ठिकाण याची विशिष्ट माहिती उपलब्ध झाली आहे. किनारी भागातील पोलीस यंत्रणेने म्हटले आहे,की २३ मे पासून ते सतर्क आहेत. कारण श्रीलंकेतून तेव्हापासून सतर्कतेची गुप्तचर माहिती मिळत आहे. मच्छीमार बोटींचे मालक व इतरांना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.

श्रीलंकेत २१ एप्रिल रोजी आयसिसने आलिशान हॉटेलांत आणि चर्चमध्ये बॉम्बस्फोट घडवले होते. भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माहितीनुसार हल्ल्याचा कट केरळातही रचला गेला होता. केरळातील अनेक जणांचा संबंध आयसिसशी असल्याचे गुप्तचरांचे म्हणणे आहे. श्रीलंकेत २१ एप्रिलला बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते.

तालिबानकडून अनन्वित छळ

काबूल : अफगाणिस्तानातील ज्या लोकांचे अपहरण तालिबानने केले होते,  त्यांना क्रूर  वागणूक  देऊन छळ करण्यात आल्याचे संयुक्त राष्ट्रांनी रविवारी म्हटले आहे. तालिबानशी अमेरिकेच्या वाटाघाटी सुरू असताना छळाच्या या बातम्या आल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तानातील मदत कार्यक्रमाच्या सूत्रांनी सांगितले, की तालिबानच्या ताब्यातून ५३ जणांची सुटका करण्यात आली आहे. त्यातील १३ जणांकडून माहिती घेतली असता  त्यांनी आपला छळ झाल्याचे सांगितले.