सिंगापूर स्वातंत्र्य दिनाच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त सिंगापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय दिवस संचलनाला भारताचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधानांनी अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांची नियुक्ती केली आहे. गीते ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सिंगापूर स्वातंत्र्यदिनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत सरकारने विविध संकल्पना मांडल्या आहेत. यात युवा आणि महिला शक्तीचा प्रामुख्याने समावेश आहे. ‘एकत्व’ हे तत्त्व जपताना सर्वानी हा सोहळा साजरा करायचा आहे. सिंगापूरच्या विकासात सुरुवातीपासून प्रत्येक व्यक्तीने दिलेले योगदान आणि भविष्यात विकासाच्या वाटा काय असतील, याबाबत सरकारने विविध पातळींवर कार्यक्रम हाती घेतले आहेत. यालाच त्यांनी ‘एस-जी ५०’ असे नाव दिले आहे.